नवी दिल्ली ( Ram Setu ) – भारत आणि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे रामसेतूसंदर्भात संशोधन केले जावे अशी मागणी केली जात आहे. भारतीय पुरातत्व विभागातर्फे (आर्किऑलिजकल सर्व्हे ऑफ इंडिया- एएसआय) किंवा अन्य एखाद्या विद्यापीठामार्फत हे संशोधन करण्याची मागणी पुढे आली आहे.
यापूर्वी पुरातत्व संशोधक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, श्रीलंकेत हजारो वर्षांपूर्वीच्या नाण्यांवर रामसेतूची चित्रे आहेत. अशा स्थितीत रामसेतूवर अधिक संशोधन करण्याची गरज अधिक जाणवते. 2016 मध्ये सिल्चर येथील आसाम विद्यापीठाच्या संग्रहालय विज्ञान केंद्राने पहिल्यांदा रामसेतूचे पुरातत्त्वदृष्टीने महत्त्व आणि प्राचीनता दाखवून देण्यासाठी योजना तयार केली होती.
त्याअंतर्गत या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी तसेच तेथील पुरातात्त्विक अवशेषांचे व्यवस्थित संशोधन करण्यात येणार होते. त्यानुसार आर्थिक मदतीसाठी भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेकडे (आयसीएचआर) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आयसीएचआरने पाण्यात बुडालेल्या रामसेतूची पुरातात्विकदृष्ट्या तपासणी करण्यास सहमती दर्शवलेली होती.
या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली होती, मात्र आर्थिक मदत आणि अन्य आवश्यक मंजुऱ्या न मिळाल्याने याठिकाणी उत्खनन करणे शक्य झाले नाही. डॉ. आलोक त्रिपाठी यांनी केलेल्या संशोधनानुसार श्रीलंकेतील जाफना परिसरातील राजा आर्य चक्रवर्तीच्या काळात जारी करण्यात आलेल्या नाण्यांवरील रामसेतुचे चित्र आणि प्रत्यक्ष रामसेतू यांच्यामध्ये साम्य आढळून येते. ( Ram Setu )
सध्या रामसेतूचा अर्धा भागच भारताच्या ताब्यात आहे. रामसेतू भारताच्या मालकीच्या समुद्रात सुरू होऊन श्रीलंकेच्या सीमेत संपतो. अशी मान्यता आहे की, राजा आर्य चक्रवर्तीच्या काळात जारी करण्यात आलेल्या नाण्यांवरील जे चित्र आहे ते रामसेतूशी जुळणारे आहे. ते अन्य कुठल्या पुलाचे आहेत याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत.
त्रिपाठी यांच्या संशोधनानुसार रामसेतूशी संबंधित परंपरा आणि श्रद्धा किमान 2000 वर्षांपासून आहेत. त्यातून व्यापक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातात्त्विकदृष्ट्या या बांधकामाचे संशोधन झाले पाहिजे यासाठी या श्रद्धा आणि परंपराचा आधार घेतला जात आहे. तेथील पुरातत्त्व अवशेष, प्राचीन शिलालेख, नाणी, मूर्ती आणि चित्रांचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. या सगळ्यांचे शास्त्रीय अंगाने संशोधन करणे गरजेचे आहे.
सध्या रामसेतूचे बहुतेक भाग पाण्याखाली असल्याने पाण्याखालील अवशेषांचेही संशोधन व्हायला हवे. रामायणात वर्णन केल्यानुसार याठिकाणी समुद्रातील खडक आणि किनाऱ्यांना जोडण्यासाठी कितपत मानवी हस्तक्षेप झाला होता याचेही संशोधन होणे गरजेचे आहे.
रामसेतू भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर रामेश्वरम आणि श्रीलंकेदरम्यान आहे. मन्नार खाडीदरम्यान त्याची लांबी 48 किलोमीटर आहे. पुराणातील कथांनुसार रावणाशी युद्ध करण्यासाठी आणि सीतेची सुटका करण्यासाठी राम आणि वानरसेनेने लंकेत पोचण्यासाठी समुद्रावर हा पूल बांधला होता. ( Ram Setu )