चेन्नई : भारत-विंडीज दरम्यान तीन सामन्याच्या मालिकेस आज सुरूवात झाली असून पहिला सामना चेन्नईतील एम.ए.चिदंबरम स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्टइंडिजसमोर विजयासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले आहे.
वेस्टइंडिज कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ८ बाद २८७ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. केएल राहुल ६ आणि कर्णधार विराट कोहली ४ धावांवर झटपट बाद झाले, तेव्हा भारताची २ बाद २५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहित आणि श्रेयसने डाव सावरला आणि तिस-या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. रोहित शर्मा ३६ वर असताना जोसेफने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर अय्यर आणि पंतने चौथ्या विकेटसाठी ११४ धावा जोडत संघाची धावसंख्या १९४ पर्यत नेली.
श्रेयस अय्यरने ८८ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ७० आणि रिषभ पंतने ६९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७१ धावांची खेळी केली. त्यानंतर केदार जाधवने ४०, रविंद्र जडेजा २१, शिवम दूबे ९ आणि दीपक चहरने ७ धावा करत संघाची धावसंख्या २८७ पर्यंत नेली.
वेस्टइंडिज कडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेलने १० षटकात ४६ धावा देत २ गडी बाद केले. कीमो पाॅल आणि अलजारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ गडी तर कायरन पोलार्डने १ गडी बाद केला.