मुंबई – मीरा-भाईंदरमध्ये राज्यातील पहिले वारकरी भवन उभारण्यात येत आहे. या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते पार पडला. राज्यातील राजकारणात वारकरी संप्रदायातील आमदार विधिमंडळात घेणे ही काळाची गरज आहे असे स्पष्ट मत यावेळी इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केलं.
संतसाहित्य हे विद्यार्थाच्या अभ्यासक्रमात आणणे गरजेचे असून त्यामुळे आदर्श समाज तयार करण्यास मदत होणार असल्याचे महाराजांनी यावेळी सांगितले. या वेळी इंदुरीकरांच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम नाटय़गृहात पालिका प्रशासनाने आयोजित केला होता. राज्यातील परिस्थिती पाहता पदवीधर आमदाराप्रमाणे राज्य शासनाने किमान एक तरी वारकरी संप्रदायातील आमदार विधिमंडळात घ्यावा, अशी जाहीर मागणीच इंदुरीकर महाराजांनी यावेळी भाषणातून केली.
या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन आणि आयुक्त दिलीप ढोले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यासोबतच इंदुरीकरांचे कीर्तन असल्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी भक्त देखील यावेळी उपस्थित होते. या भवनाला संत ज्ञानेश्वर माउली वारकरी भवन असे नाव देण्यात येणार आहे. तसेच या भवनाच्या अंतर्गत सजावटीसाठी प्रताप सरनाईक यांच्या निधीतील २ कोटी रुपये मजूर करण्यात आले आहेत.