नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील लष्करी पातळीवरची चर्चा फिसकटली आहे. दोन्ही देशांच्या लष्करी प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची तेरावी फेरी झाली. त्यात पूर्व लडाखमधील तणावाच्या स्थितीवर कोणताही तोडगा काढण्यात अपयश आले. भारताच्या वतीने चीनला अनेक विधायक प्रस्ताव देण्यात आले; पण ते चीनने मान्य केले नाहीत, असे भारतीय लष्करातर्फे सांगण्यात आले आहे.
चीनकडून भारताने गेल्या काही दिवसांपासून जी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली आहे ती मान्य करण्यास त्यांनी साफ नकार दिल्याने भारतालाही या प्रकरणात आता आपली भूमिका कडक करावी लागेल, असेही भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात सूचित केले आहे.
पूर्व लडाखमधील तणावाचा भाग सोडून अन्य ठिकाणच्या बाबींविषयीही चीनकडे भारताने काही प्रस्ताव ठेवले होते तेही मान्य करण्यास चीनने नकार दिला. त्यामुळे पूर्व लडाख सोडून अन्य बाबीवरील चर्चाही पुढे सरकू शकली नाही. ही चर्चा चुशुल-मोल्डो सीमा भागात पूर्व लडाखमध्ये चीनच्या हद्दीत रविवारी झाली. सुमारे साडेआठ तास ही चर्चा सुरू होती.
या चर्चेच्या संबंधीत चीनच्या पीएलए पश्चिम कमांडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने या चर्चेत अवास्तव आणि अयोग्य मागण्या मांडल्या. त्यावर चर्चा होणे कदापिही शक्य नव्हते. आम्ही सीमा भागातील तणाव निवळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले; पण भारताच्या अवास्तव मागण्यांमुळे त्या प्रयत्नांत यश आले नाही, असे चीनने म्हटले आहे.
चीनने प्रत्यक्ष ताबारेषेची स्थिती सातत्याने बदलून द्विपक्षीय कराराचा भंग केला आहे, असा भारताचा दावा आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती आहे तशीच ठेवली पाहिजे, असे द्विपक्षीय करारात ठरले आहे असे असताना चीनने एकतर्फी पद्धतीने तेथील स्थिती बदलली, असे भारताचे म्हणणे आहे.
दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांमध्ये ताजिकीस्तानची राजधानी दुशानबे येथे चर्चा झाली होती. त्यातील चर्चेचा संदर्भ चीनला देऊन त्यांना काही बाबी मान्य करण्याची सूचना भारतीय बाजूने केली होती. दोन्ही देशांच्या लष्करातील वादाचे मुद्दे त्वरित निकाली काढण्याचा निर्णयही त्या विदेश मंत्री पातळीवरील बैठकीत झाला होता. ही चर्चा फिसकटली असली तरी दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आणि प्रत्यक्ष मैदानावरील स्थैर्य कायम ठेवण्याचे मान्य केले आहे.