दहिवडी – माढा मतदारसंघातून निष्ठेचा विचार न करता आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतल्यामुळे इच्छुक अभयसिंह जगताप नाराज झाले आहेत. वरकुटे मलवडी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांच्या भावना ऐकल्यानंतर अपक्ष लढायच की पक्षातून याचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचे सांगून शरद पवार आणि पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार केला नसल्याची खंत अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केली.
जगताप म्हणाले, माढा मतदारसंघाचे प्रश्न लक्षात घेऊन देशपातळीवरील प्रश्न विचारात घेऊन ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, पक्षाने आणि पवार यांनी विश्वास दाखवला नाही. कदाचित मीच तो विश्वास संपादन करण्यासाठी कमी पडलो असेल, त्यामुळेच पवार यांच्य मनात अभय जगतापला तिकीट देण्याचा विचार आला नसावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आपण पक्षातून लढायचं की जनतेतून, याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होईल, असेही जगताप यांनी सांगितले.
वरकुटे मलवडीतील या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी अभयसिंह जगताप यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी काहीही झालं तरी लढायचचं, तिकीट नाही तर अपक्ष लढायचचं, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याचबरोबर शरद पवार यांनी निष्ठेला ओळखून अभयसिंह जगताप यांना संधी द्यायला हवी, अशी मागणी केली. शरद पवार यांनी आणि पक्षाने निष्ठेचा विचार केला नाही तर दादा तुम्ही अपक्ष मैदानात उतरा, बाकीचं आमच्यावर सोपवा, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
पवार यांची डोकेदुखी वाढणार ?
तिकिटासाठी अद्यापपर्यंत विचार न झाल्याने अभय जगताप नाराज आहेत. त्यानुसार त्यांनी वेळप्रसंगी बंड करण्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे अभय जगताप यांचे होऊ घातलेले बंड शरद पवार यांची माढा लोकसभा मतदारसंघाच्यादृष्टीने डोकेदुखी वाढवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.