नवी दिल्ली – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली केलेल्या दमदार खेळाने भारत प्रथमच फिफा नेशन्स कप-2022साठी पात्र ठरला आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारत या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात 27 ते 30 जुलै या दिवसांत डेन्मार्कमधील कोपेनहेगनमध्ये खेळवली जाणार आहे. भारताने प्लेऑफमध्ये कोरिया आणि मलेशिया या संघांना मात देत पात्रता मिळवली आहे.
“फिफा नेशन्स कप’च्या यंदाच्या मोसमात भारताला प्ले-इन्समध्ये स्थान दिले गेले होते. यावेळी प्लेऑफमध्ये भारताला एन्ट्री मिळाली होती. प्ले-इनच्या दरम्यान भारताने 32 सामने खेळले, ज्यातील 12 सामने जिंकले. तर 11मध्ये पराभव आणि 9 सामने अनिर्णीत राखले.
या कामगिरीसह भारताने डिविजन 1 मध्ये स्थान कायम ठेवले. ज्यामुळे सत्राच्या अखेरीस भारत वर्ल्ड रॅंकिंगमध्ये 19व्या नंबरवर राहिला आणि दिमाखात पात्रता मिळवली. यावेळी भारताने चरणजोत सिंह, सिद्ध चंदराना आणि सारांश जैन यांच्या खेळीच्या मदतीने कोरिया आणि मलेशियासारख्या संघाना मात देत ही पात्रता मिळवली आहे.
या स्पर्धेसाठीची भारतीय फुटबॉल संघाची यात्रा जानेवारी 2021मध्ये सुरु झाली. त्यावेळी एआयएफएफने फिफा नेशन्स सीरीज 2021 साठी फिफासोबत भागीदारी केली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारत 60 देशांमध्ये होता. मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्रात भारताला ठेवण्यात आले होते. भारत त्याच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर होता. केवळ एका स्थानाच्या फरकाने भारत फिफा नेशन्स प्लेऑफ 2021 मध्ये स्थान मिळवण्यापासून हुकला होता.