कोलकाता : भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत आहे, असे मत अर्थशास्त्रासाठी नोबेल जिंकणारे भारतीय-अमेरिकन अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशाच्या आर्थिक पुनरुज्जीवनसाठी लवकरच कोणतेही आश्वासन दिले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती डळमळीत आहे. सध्याच्या वाढीची आकडेवारी पाहिल्यानंतर नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होण्याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. गेल्या पाच-सहा वर्षात कमीतकमी आपण काही प्रमाणात वाढ करू शकलो. पण आता हे आश्वासनही देता येऊ शकणार नाही, असे अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला बॅनर्जी यांनी सांगितले.
जागतिक गरीबी दूर करण्याच्या प्रायोगिक दृष्टिकोनाबद्दल बॅनर्जी त्यांच्या पत्नी एस्तेर डुफलो आणि आणखी एक अर्थशास्त्रज्ञ मायकेल क्रेमर यांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला आहे. “मी गेल्या वीस वर्षांपासून हे संशोधन करत आहे. दारिद्रय निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे.कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात नोबेल मिळण्याची आपल्याला कधीही कल्पना नव्हती, अशा शब्दात मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील फोर्ड फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रचे प्राध्यापक अभिजीत बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.