हैदराबाद :- केंद्रातील एनडीए सरकारने गेल्या नऊ वर्षांत “तेलंगणाविरोधी” भूमिका घेतल्याचा आरोप करीत राज्यातील सत्ताधारी बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामाराव यांनी आमचा पक्ष पंतप्रधान मोदींच्या शनिवारच्या तेलंगणा भेटीवर बहिष्कार घालेल अशी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र असलेले रामाराव यांनी दावा केला की, मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी तेलंगणाविरोधी कृती केली आहे. त्यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात तेलंगणाला दिलेले कोणतेही आश्वासन पुर्ण केलेले नाही.
मोदींनी एक वर्षापूर्वी गुजरातमधील दाहोद येथे 20,000 कोटी रुपयांच्या लोकोमोटिव्ह कोच कारखान्याची पायाभरणी केली होती, परंतु तेलंगणाला मात्र केवळ 521 कोटी रुपयांच्या वॅगन उत्पादन युनिट देण्याची घोषणा केली आहे.वास्तविक आंधप्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार तेलंगणामध्ये हा रेल्वे कोच कारखाना उभारला जाणार होता.आम्ही मोदींचा 521 कोटी रूपयांचा प्रकल्प स्वीकारणार नाही असे ते म्हणाले.
वारंगलजवळ आदिवासी विद्यापीठ उभारण्यासाठी राज्य सरकारने 300 एकर जागा उपलब्ध करून दिली असली तरी अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आदिवासी विद्यापीठाची स्थापना हा सुद्धा आंध्रप्रदेश पुनर्रचना कायद्यात नमूद केलेला मुद्दा आहे असे ते म्हणाले. ज्या हेतून तेलंगणाची स्थापना झाली होती त्याची मोदींनी हत्याच केली आहे असे ते म्हणाले.
त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवले आहे की उद्या त्यांच्या (मोदी) भेटीला आमच्यापैकी कोणीही उपस्थित राहणार नाही.आम्ही त्यांच्या या भेटीवर बहिष्कार घालणार आहोत.