नवी दिल्ली – मलेशिया आणि भारतासारख्या समविचारी देशांनी इस्रायल-हमासच्या वादामध्ये मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा मलेशियाचे परराष्ट्र मंत्री झांबरी अब्दुल कादिर यांनी व्यक्त केली आहे. कादिर तीन दिवस भारत दौऱ्यावर होते. हे युद्ध तात्काळ थांबायला हवे आणि मानवतावादी भूमिकेतून मदत करण्यासाठी मोकळा मार्ग लवकरच उपलब्ध व्हायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या सविस्तर चर्चेमध्ये इस्रायल-हमासच्या युद्धाचा मुद्दा प्राधान्याने होता, असे त्यांनी सांगितले.
या युद्धामध्ये मध्यस्थी करणे ही भारत आणि मलेशियासारख्या समविचारी देशांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. इस्रायल-हमासच्या युद्धात आतापर्यंत 10 हजार लोक मारले गेले आहेत. सुमारे 4 हजार मुले आणि संयुक्त राष्ट्राचे कर्मचारीही ठार झाले आहेत.
नैतिक विवेक जागा असलेल्या कोणत्याही देशाने अशी कृती मान्य करता कामा नये. गाझामधील लोकांसाठी मानवतावादी मदत पोचवण्याची गरज आहे. याचीच चिंता भारत, मलेशिया आणि अन्य देशांनी केली पोहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.