नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष आज त्यांचा 43 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. 1980 मध्ये आजच्याच दिवशी भाजपची स्थापना झाली होती. त्याच पार्श्वभुमीवर आज देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन भाजपकडून करण्यात आले आहे. देशातील वेगवेगळ्या कार्यालयात कार्यक्रम पार पडणार आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संदेश दिला.
यावेळी बोलताना पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच आज असलेल्या हनुमान जयंतीचा उल्लेख करत आपण सर्व हनुमानजींपासून प्रेरणा घेत असल्याचे म्हंटले. जेव्हा हनुमानजींना रजक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते कठोर झाले होते. अगदी तसेच जेव्हा भ्रष्टाचार.. परिवारवाद,कायदा सुव्यस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजप देखील संकल्पबद्ध होतो. कठोर व्हावे लागले तरी कठोर होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी ठणकावून सांगितलं. तसेच भारत बजरंगबलीप्रमाणे बलशाली होतोय असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
अशी होती भाजपची वाटचाल
भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होते, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झाले. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होते. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.
सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या 303 जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.