नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या देशांनी आपापल्या देशातील अणु केंद्रांची यादी एकमेकांना सादर केली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दोन्ही देश एकमेकांना दरवर्षाच्या सुरूवातीला अशी यादी सादर करीत असतात.
दोन्ही देशांमध्ये अण्विक प्रसार वाढू नये आणि एकमकांना अणु हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यातील हा एक महत्वाचा भाग आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अणु केंद्रे आणि सुविधांवर हल्ला करण्यास मनाई करण्याच्या कराराच्या तरतुदींनुसार यादीची देवाणघेवाण झाली. नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील राजनैतिक प्रतिनिधींद्वारे एकाच वेळी या यादीची देवाणघेवाण करण्यात आली.
३१ डिसेंबर १९८८ रोजी या विषयीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि २७ जानेवारी १९९१ रोजी ही पद्धत अंमलात आली. दोन्ही देशांनी प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या जानेवारीला कराराच्या अंतर्गत येणाऱ्या आण्विक प्रतिष्ठान आणि सुविधांची यादी एकमेकांना देणे बंधनकारक आहे. दोन्ही देशांतील यादीची ही सलग ३३ वी देवाणघेवाण आहे. पहिल्या यादीची देवाण घेवाण १ जानेवारी १९९२ ला झाली होती.