मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपासून शाळा, कॉलेज ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र, राज्यात करोना संसर्ग आटोक्यात आल्याने सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच महाविद्यालयाही खुले करण्यात आले असून ऑफलाईन परिक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात कुलगुरुंच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, करोनाकाळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आणला. त्याप्रमाणे शिक्षण सुरूही झाले. परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू असताना लिखाणाचा सराव होत नव्हता. यामुळे वाढीव वेळ मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.