परताव्या संदर्भात बनावट ई-मेलवर विश्वास ठेवू नये
नवी दिल्ली : एकीकडे भारतीय जनता आणि सरकार करोना व्हायरसचा परिणाम कमी व्हावा याकरिता प्रयत्न करीत असतानाच सायबर हल्लेखोर या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवावे अशा सावधगिरीच्या सूचना प्राप्तिकर विभागाने करदात्यांना पुन्हा दिल्या आहेत.
प्राप्तीकर विभागाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, प्राप्ति करदात्यांनी परतावा देण्यासंदर्भात आलेल्या बनावट लिंक वर क्लिक करू नये. सध्या सायबर हल्लेखोर अशा प्रकारचे बनावट ई-मेल प्राप्तिकर दात्यांना करीत असल्याच्या काही तक्रारी आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात येत असल्याचे प्राप्तिकर विभागाने ट्विटवर करदात्यांना सांगितले आहे.
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार 8 ते 20 एप्रिल दरम्यान प्राप्तीकर विभागाने 14 लाख करदात्यांना 9 हजार कोटी रुपयाचा परतावा दिलेला आहे. हा परतावा वेगात द्यावा, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत करदात्यांना मदत होईल अशी सूचना 8 एप्रिल रोजी अर्थ मंत्रालयाने जारी केली होती. त्याचा लाभ आतापर्यंत 14 लाख करदात्यांना झालेला आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सायबर हल्लेखोरांनी कंपन्या आणि बॅंक ग्राहकांनाही लक्ष्य केलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी अशा हल्ल्यापासून सावध राहावे अशा सूचना याअगोदर वेळोवेळी बॅंकाडून करण्यात आलेल्या आहेत. कर्जदारांना तीन महिने कर्जाचा हप्ता न देण्याची सवलत बॅंकांनी दिलेली आहे.
या संदर्भातही बनावट विचारणा करण्याचा प्रकार बॅंकांच्या ग्राहकाकडे झालेला आहे. अशा पद्धतीने विचारणा करून बॅंक ग्राहकाची माहिती काढून नंतर त्यांच्या खात्यावर हल्ला करण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अनाहूत ई- मेल आणि विचारणाबाबत अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.