पुणे – तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेसमोरील अडचणी सुरूच आहेत. आता योजनेच्या सल्लागाराने अंमलबजावणीतून काढता पाय घेतला आहे. करोनामुळे रखडलेले काम, मनुष्यबळ कमतरतेमुळे या प्रकल्पाचे काम करणे शक्य नसल्याचे सांगत “एसजीआय’ कंपनीने याबाबतची नोटीस महापालिकेस दिली आहे. त्यामुळे पालिका आता नव्याने सल्लागार नेमणार आहे.
योजनेच्या कामासाठी 2011 मध्ये “एसजीआय’ कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर प्रकल्पाचा पहिला आराखडा सादर झाल्यानंतर त्याच्या निविदा 22 ते 25 टक्के दराने जास्त असल्याने या कामाचा खर्च 3,500 कोटींवर गेला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्याने ही वादग्रस्त निविदा रद्द करण्यात आली.
त्यानंतर महापालिकेने पुन्हा नव्याने या प्रकल्पाचे एस्टिमेट तयार केले. निविदाही कमी दराने आल्याने त्यामुळे या योजनेचा खर्च 1 हजार कोटींनी कमी होत तो थेट 2,521 कोटींवर आला. या योजनेचे सल्लागार म्हणून “एसजीआय’ची नियुक्ती केल्याने प्रकल्प रकमेनुसार, कंपनीस 18 कोटींचे सल्लाशुल्क दिले जाणार होते. तर आता पर्यंत पालिकेने 9 कोटींचे सल्लाशुल्कही दिलेले आहे. मात्र, आता कंपनीने काढता पाय घेत, महापालिकेस काम थांबवण्याची नोटीस दिली आहे.
कंपनीशी झालेल्या करारानुसार प्रकल्पाचा आराखडा, त्याची अंमलबजावणी आणि त्यानंतर पुढील पाच वर्षे प्रकल्पाची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी कंपनीकडे होती. मात्र, या योजनेचे काम अवघे 20 टक्केही झालेले नसताना कंपनीने काढता पाय घेतल्याने पालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे.
दरम्यान, यापूर्वीच सल्लागामुळे महापालिकेस या योजनेत नव्याने 52 कोटींच्या जलवाहिन्या टाकण्याची वेळ आली आहे. त्यात, आणखी 15 ते 16 कोटींची भर पडणार आहे.