लोणी-धामणी -धामणी (ता. आंबेगाव) येथील धनगर दऱ्यातील योगेश नानाभाऊ जाधव यांच्या खिलारी बैलावर बुधवारी (दि. 2) सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यात बैलाचा मृत्यू झाला आहे.
धामणीतील ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क केला असता वनरक्षक एस. एन. आनासुने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. यावेळी वनकर्मचारी दिलीप वाघ, जाधव उपस्थित होते. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबेगावच्या पूर्व भागातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्याच्या चार-पाच घटना घडल्या आहेत. त्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, वासरे मृत्युमुखी पडले असून, काही जनावरे जखमी अवस्थेत आहेत. वनविभागाचे अधिकारी येतात, पंचनामा करून जातात मात्र एवढ्या घटना घडल्या तरी सुद्धा बिबट्याला जरेबंद करण्यासाठी अद्याप पिंजरे लावलेले नाहीत.