सणबूर – राज्याचे गृह व अर्थमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र शासनाचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये आपले होमपिच असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या पदरात झुकते माप त्यांनी टाकले आहे.
सातारा येथे नविन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना, पाचगणी-महाबळेश्वर पर्यटनाला चालना देण्याकरीता विकास आराखडा मंजूरी, सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकरीता निधी देण्याबरोबर डोंगरी तालुक्याच्या विकासासह पाटण विधानसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेत जिल्ह्याच्या पदरात भरघोस निधी मंजूर करुन घेत आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करुन घेण्यास अर्थमंत्री यशस्वी झाले आहेत.
सुमारे 1 तास 11 मिनिटे सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सातारा जिल्ह्याला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी सातारा येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचे शासनाचे नियोजन असल्याची जाहीर घोषणा सभागृहात केली. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास रुपये 12 कोटी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगून पाचगणी महाबळेश्वर येथे पर्यटनाला चालना मिळण्याकरीता विकास आराखड्याला 100 कोटी रुपये इतका नियतव्यय राखीव ठेवण्यात आला असल्याचे जाहीर केले.
आपण ज्या मतदारसंघातून राज्याचे नेतृत्व करतो तो पाटण विधानसभा मतदारसंघ ज्याप्रमाणे डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघ आहे. तशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातील इतर मतदारसंघही डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघ आहेत, ही भावना मनी बाळगून त्यांनी डोंगरी भागाच्या विकासाकरीता प्रलंबित कामे गतिने पूर्ण करण्याची आवश्यकता ओळखून निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजूर करण्याची भूमिका घेतली.
त्यामुळे पहिल्यांदाच सुमारे 95 कोटी रुपयांचा नियतव्यय यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केला. तर परिवहन महामंडळाच्या जुन्या बस बदलून सुमारे 1600 नवीन बस विकत घेण्यात येणार आहेत. यातील जास्तीत जास्त बस डोंगरी तालुक्यात विभागून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांना न्याय देण्याबरोबर ना. शंभूराज देसाई यांनी त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पामध्ये भरीव असा नियतव्यय मंजूर करुन घेतला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील जनहितार्थ अनेक कामे राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजूर होण्याकरीता प्रस्तावित केली आहेत. अर्थमंत्री म्हणून सर्व कामांना कालबध्द मंजूरी घेण्याकरीता कटीबध्द असल्याचे ना. देसाई यांनी म्हटले आहे.