हिंजवडी, (वार्ताहार) – लोकवस्तीत बिळात घुसलेल्या कोब्रा नागाला सर्पमित्रांनी पकडून जंगल अधिवासात सोडून त्याची सुटका केली. सर्पमित्राच्या धाडसी कृत्याचे मोठे कौतुक होत आहे. रखरखत्या उन्हाच्या झळानी माणूसच काय तर जलचर प्राणी देखील गारव्याच्या शोधात असतात, याचा प्रत्यय आयटीनगरी माणगावातील नागरिकांना नुकताच आला.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, बोडकेवाडी फाट्याजवळ पारखीवस्तीलगत सुखनिवास सोसायटीच्या समोर फिल्टर पाण्याच्या एका प्लान्टमध्ये गारव्याच्या शोधार्थ कोब्रा जातीचा नाग पाण्याच्या टाकीजवळ गारव्याच्या ठिकाणी बसला होता.
प्लांटमधील कामगारांनी त्याला पाहिल्यानंतर बाहेर पळत असताना त्याठिकाणी उंदरांनी जमिनीत केलेल्या बोळात तो साप घुसला. त्यास पाहणाऱ्या राजू शेख कामगाराने तत्काळ आकाश पारखी याला याबाबत कळविले असता, त्याने सर्पमित्र बालाजी शिंदे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.
सर्पमित्र येईपर्यंत साप बिळात घुसला होता. अखेर बिळात टँकरने पाणी सोडल्यानंतर सहा फूट लांबीचा कोब्रा फुस्कारत बाहेर आला. बालाजी शिंदे यांनी मोठ्या चतुराईने व शिताफीने हा कोब्रा नाग पकडला. व त्यास एका प्लास्टिक बरणीत त्याला कैद केले. त्यानंतर भोईरवाडी येथील जंगल अधिवासात त्याला सोडून त्याची सुटका केली.
मूळचे रायगड जिल्ह्यातील माण गावचे रहिवासी असलेल्या बालाजी शिंदे यांनी आयटीनगरी परिसरात अनेक साप पकडून त्यांना जंगलात सोडून जीवदान दिले आहे. माणचे वीजवितरणचे वायरमेन संजय जाधव यांच्यासोबत सहकारी म्हणून ते काम करतात.
त्यांनी आतापर्यंत कोब्रा जातीचे तब्बल सात हजार नाग पकडून त्यांना जंगल अधिवासात सोडल्याचे त्यांनी सांगितले. गेली वीसवर्षांपासून ते सर्पमित्र म्हणून विनामूल्य सेवाभावी काम करत आहेत. त्यांनी पकडलेला कोब्रा हा २५ वर्ष वयाचा असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.
साप हे शेतकऱ्यांचे मित्रच असतात. त्यामुळे त्यांना मारण्याऐवजी जलचर प्राण्यांचे जतन व्हावे, त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे म्हणून केवळ छंद म्हणून आपण विनामूल्य सर्पमित्र काम करत आहे असे त्यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.