17 जून पासून दंडात्मक कारवाई सुरु
कोल्हापूर – सध्या पाणी टंचाईची परिस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळ धारकाने आपल्या नळांना तोट्या बसवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी-वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही घटकांकडून पाणी प्रदूषित करण्यामध्ये व पाण्याचा दुरुपयोग करण्यामध्ये वाढ होत आहे. ग्रामीण भागात नळांना तोट्या न बसविलेने लाखो लिटर पाणी सांडपाण्याच्या स्वरूपात वाहून जात आहे. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त वीज पाणी उपसा करण्यासाठी वापरावी लागते. यामुळे पाणी पुरवठा योजनांवर अतिरिक्त ताण वाढत आहे.
यावरच्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेमार्फत पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या न बसविल्यास 5 हजार रूपये दंड व त्यानंतरही न बसविल्यास प्रती दिन 200 रूपये याप्रमाणे वैयक्तीत नळ धारकांना दंडात्मक कारवाई सुरु करण्याचा ठराव 7 डिसेंबर 2018 च्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. या दंडात्मक कारवाईमध्ये ठराव झाला असला तरी आचार संहिता असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र 17 जून 2019 पासून ग्रामपंचायत स्तरावर या ठरावाप्रमाणे दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. यासाठी दिनांक 14 जून 2019 पर्यतं सर्व नळ धारकांनी आपल्या नळांना तोट्या बसविणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या नळांना तोट्या बसवल्या नसतील अशा नळ धारकांवर कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा परिषदेमार्फत कळवण्यात आले आहे.