आता सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे लक्ष
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी शुक्रवारी 70.83 टक्के मतदान झाले. आता 23 डिसेंबरला (सोमवार) जाहीर होणाऱ्या निकालाबाबत उत्सुकता आहे.
झारखंडमध्ये अखेरच्या टप्प्यात विधानसभेच्या 16 जागांसाठी शांततेत मतदान झाले. त्यामुळे झामुमोचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन, भाजपचे काही मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री स्टीफन मरांडी यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले.
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. विधानसभा निवडणूक जिंकून सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर विरोधक सत्ता परिवर्तनाची आस बाळगून आहेत. भाजपची लढत प्रामुख्याने झामुमो, कॉंग्रेस आणि राजदचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीशी आहे.
त्या महाआघाडीने हेमंत सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. इतर अनेक पक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे काही जागांवर बहुरंगी लढत होत आहे. आता भाजप झारखंडमध्ये पुन्हा सत्तेवर येणार की सत्ताबदल होणार, हे मतमोजणीमुळे स्पष्ट होईल.