औरंगाबाद – राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर आता औरंगाबादमध्येही करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. औरंगाबाद शहरात आज दिवसभरात तब्बल 58 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये करोनाबाधितांचा आकडा हा 900 वर पोहोचला आहे. तर 24 तासात दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा हा 25 वर पोहोचला आहे.
करोनाचा वाढता आकडा नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात सध्या पॅरामिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनसह शहराच्या इतरही परिसरात हे जवान तैनात असणार आहेत. तर दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असलेली नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी आता कंटेन्मेंट झोन परिसरात गस्ती पथक सुरू करण्यात आले आहेत. हे पथक दिवसातून दोन वेळा रेड झोन मध्ये गस्त घालणार आहे.
दुसरीकडे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद शहरातील संजय नगर परिसरातील करोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा तब्बल 106 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा परिसर औरंगाबाद शहरातील अतिसंवेदनशील परिसर बनला आहे.
औरंगाबदमध्ये आज सकाळी करोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1) अन्य (7) या भागातील आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.