गुवाहाटी, – आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराचा सुमारे 43 लाख नागरिकांना फटका बसला असून अनेक जण बेघर झाले आहेत. या पुरामुळे 32 ते 35 जिल्हे प्रभावीत झाले आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
आसाममध्ये पुरामुळे जमिनी वाहून गेल्या असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय रस्तेही पाण्याखाली गेल्याने स्थलांतर करणे देखील कठीण झाले आहे. तर हजारो लोकांनी राहती घर सोडावी लागली आहेत. त्याचबरोबर भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एका अधिकृत निवेदनात अशी माहिती देण्यात आली आहे की, गंभीर रुग्ण, वृद्ध महिला आणि लहान मुलांसह सुमारे 4 हजार 500 अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
बचाव मोहिमेसोबतच लष्कराचे जवान हजारो लोकांना मदत करण्यासाठी मदत छावण्यांमध्ये आवश्यक वस्तूंचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. आसाममधील कछार जिल्ह्यात संततधार सुरु आहे. या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 43 हजार 338 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, जिया भराली, कोपिली येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या 373 मदत केंद्रात 1 लाख 8 हजार 104 पूरग्रस्त लोक राहत आहेत. तर, बजली जिल्ह्यात 3.55 लाख, दरंग जिल्ह्यात 2.90 लाख, गोलपारा येथे 1.84 लाख, बारपेटा 1.69 लाख, नलबारी 1.23 लाख, कामरूपमध्ये 1.19 लाख आणि होजई जिल्ह्यात 1.05 लाख लोक बाधित झाले आहेत.