नवी दिल्ली – आसाममधील 5 बंडखोर गटांबरोबर आज त्रिपक्षीय शांतता करार करण्यात आला. हे गट, केंद्र सरकार आणि आसाम सरकारच्यावतीने या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कार्बी आंग्लोंग भागात कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराला संपवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. यामुळे कार्बी आंग्लोंग भागात शांतता प्रस्थापित होईल आणि सर्वसमावेशक विकासालाही चालना मिळेल, असे या प्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
पीपल्स डेमोक्रॅटिक ग्रुप ऑफ कार्बी लॉंग्री, कार्ब लोंग्री एनसी हिल्स लिबरेशन फ्रंट, कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर, कुकी लिबरेशन फ्रंट आणि युनायटेड पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनांच्या प्रतिनिधींनी या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या संघटनांच्या सुमारे 1 हजार सदस्यांनी याप्रसंगी शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले. हे सर्व जण आता मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत.
यापद्धतीचे शांतता करार यापूर्वी एनडीएफबी, एनएलएफटी आणि ब्रु समुदायाबाबतही करण्यात आलेले आहेत. या सर्व बंडखोरांना आता मुख्य प्रवाहात सामावून घेण्यात आलेले आहे. कार्बी आंग्लोंग शांतता करार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “बंडखोरमुक्त ईशान्य भारताच्या’ स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले.