गुवाहाटी – आसामातील कॉंग्रेस आमदार शेरमन अली अहमद यांनी राज्यात 1983 साली झालेल्या आंदोलनातील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक विधान केल्याने त्यांना कॉंग्रेस पक्षाने निलंबीत केले आहे.
कॉंग्रेसने या आधीच त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांना देशद्रोहाच्या कलमाखाली राज्य सरकारने अटकही केली आहे. 1983 साली झालेल्या आसाम आंदोलनाच्या हिंसाचाराच्यावेळी जे आठ जण मुस्लीम समुदयाकडून मारले गेले ते हुतात्मा नव्हे तर खुनी होते असे विधान त्यांनी केले होते.
त्यांच्या या विधानांवरून भाजप युवामोर्चा व ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्यावतीने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. आमदार शेरमन यांनी असे प्रक्षोभक विधान करतानाच पक्षाच्या शिस्तीचाही अनेक वेळा भंग केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असे आसाम प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष भुपेन बोराह यांनी म्हटले आहे.