मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतली. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच चर्चा करून निर्णय घेत असल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली. अशातच राऊत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशा आशयाचे ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
काय म्हणालेत नेमकं राऊत ट्विटमध्ये
‘बार्बाडोस देशाची लोकसंख्या २.५ लाख असूनही त्यांचे मंत्रिमंडळ २७ सदस्यांचे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या तर १२ कोटी आहे. मात्र, राज्यात केवळ २ सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे. हे मंत्रिमंडळ मनमानी निर्णय घेत असून संविधानाचा आदर कुठे आहे?’ असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राऊतांनी यावेळी केली आहे.
Barbados has a population of 2.5Lacs & yet has a Cabinet of 27.
Maharashtra’s 12Cr population has cabinet of 2 members that is taking arbitrary decisionsWhere is the regard for Constitution?
Till the Constitut’l Bench of SC gives its verdict,impose President’s rule in Mah’stra pic.twitter.com/9FfGYa1tFA
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2022
इंधन दरकपात असो वा शहरांच्या नामकरणाचा विषय असो मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने ऍक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरूनच विरोधकांनी नव्या सरकारवर टीका करायला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले.