पुणे – इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी ऑफलाइन पद्धतीने सकाळी 11 ते 1 यावेळेत “सीईटी’ घेण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर अधिसूचना राज्य परीक्षा मंडळाने जारी केल्या आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येईल.
करोनामुळे परीक्षा रद्द झाल्या. त्यावर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालही लावण्यात आला. त्यापाठोपाठ राज्य मंडळाने “सीईटी’ परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम, विषय, एकूण गुण, वेळ, शुल्क याबाबत सूचना जाहीर केल्या आहेत.
परीक्षेसाठी इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलगू, हिंदी, सेमी इंग्रजी आदी माध्यमानुसार प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचे प्रश्न इंग्रजीतून व सामाजिक शास्त्र या विषयांचे प्रश्न विद्यार्थ्यांने अर्जात नमूद केलेल्या अन्य माध्यमांतून उपलब्ध असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या किंवा कायमच्या निवासस्थानच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा, तालुका, शहराचा विभाग निश्चित करावा लागणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. या अभ्यासक्रमातील प्रश्न “सीईटी’ला विचारण्यात येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी कोणतेही वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना मात्र प्रत्येक 178 रुपये एवढे शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमातील विषयनिहाय घटकही उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
परीक्षेनंतर नमूना उत्तरसूची जाहीर करण्यात येणार असून, यावर आक्षेप असल्यास ते मुदतीत नोंदवावे लागणार आहेत. सर्व आक्षेपांची खातरजमा केल्यानंतर अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन गुणपत्रकही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
पाईंटर –
– अर्ज नोंदणीसाठी http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार
– अर्ज भरण्यासाठी दि.20 ते 26 जुलैपर्यंत मुदत
– परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असेल
– राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर परीक्षा
– 100 गुणांचा दोन तासांचा एकच पेपर
– वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची प्रश्नपत्रिका
– आठ माध्यमांतून प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार
– प्रवेशपत्रही ऑनलाइनच मिळणार
– दिव्यांग विद्यार्थ्यांना मागणीनुसार लेखनिक व जादा वेळ मिळणार