नवी दिल्ली – बांगलादेशी नागरिक असल्याच्या आरोपावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्याने राज्यसभेत सोमवारी गदारोळ झाला.
पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार असणाऱ्या प्रामाणिक यांची नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यानंतर ते बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप होत आहे. तो मुद्दा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेत उपस्थित केला.
विकिपीडियावर शोध घेतल्यास संबंधित मंत्र्याविषयीची माहिती मिळेल, असे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर यांनी म्हटले. मंत्र्याच्या नागरिकत्वाबाबत मोदी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्या मागणीला कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांनी पाठिंबा दर्शवला.
मंत्री बांगलादेशी आहेत की नाहीत हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे खर्गे म्हणाले. विरोधकांच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आक्षेप घेतला. मंत्री बांगलादेशी असल्याचा आरोप निराधार आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, त्यावरून विरोधकांचे समाधान न झाल्याने राज्यसभेत काही काळ गदारोळ झाला.