सुरेश डुबल
कराड – 80 वर्षांपासून मी कराडकरांच्या सेवेत होतो. आज वयोमानाने मी पूर्णपणे जीर्ण झालो असून माझे भाग गळून पडू लागले आहेत. त्यामुळे उतरत्या वयात मला कराडकरांची सेवा करता येणार नाहीत. हे ओळखून माझ्याजवळ याआधीच एक दुसरा पूल बांधला असून, अजून एका पुलाचे काम सुरू आहे. माझी आवश्यकता यापुढे तुम्हाला भासेल असे मला वाटत नाही. आज पावसामुळे माझा काही भाग गळून पडला. भविष्यात असे आणखीन भाग गळण्याची शक्यता असल्याने, मी आपल्या सेवेत सदैव राहील ही शक्यता आता मावळली आहे. मला कराडकरांची सेवा यापुढे करता येणार नाही, याची सल नक्कीच भासेल. मी दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या हृदयात घर करून असलेला जुना कृष्णा पूल होय.
इंग्रजांच्या काळात माझ्या उभारणीला सुरुवात झाली. 1936 साली माझ्या उभारणीचा पाया घातला गेला. इंग्रजांच्या दूरदृष्टीने वाहतुकीबरोबरच प्रांता-प्रांतात व्यापार वाढावा, यासाठी माझी निर्मिती करण्यात आली. माझ्या निर्मितीला तीन वर्ष लागली. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नाने अखेर 1939 रोजी मी कराडकरांसह वाहन धारकांच्या सेवेत रुजू झालो. माझी निर्मिती करताना मला बऱ्याच खास्ता खाव्या लागल्या. माझ्या पोटात दगड, सिमेंट यासह मोठमोठाले लोखंडी अँगल घातले गेले. तेव्हा कुठे मला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.
माझी लांबी 275 मीटर करण्यात आली. मी दिसायला देखणा असावा, यासाठी माझ्या स्ट्रक्चर मध्ये चौदा कमानी प्रकारचे गाळे करण्यात आले. यानंतर माझ्या डोक्यावर लोखंडी अँगल टाकून डांबरी रस्ता करण्यात आला. माझ्या डोक्यावरील रस्त्याची रुंदी साडेसात मीटर करण्यात आली. त्यासह पादचाऱ्यांसाठी देखील माझा वापर व्हावा, यासाठी इंग्रजांनी दोन्ही बाजूस दीड मीटरचे फूटपाथ करण्याचे योजिले. कराडसह परिसरातील वरदान ठरलेल्या कृष्णामाई पासून माझे अंतर सुमारे 19 मीटर आहे. तर दोन्ही कडेला आठ मीटर. माझ्या निर्मितीसाठी त्यावेळेस इंग्रजांनी 4 लाख 87 हजार रुपये इतका खर्च केला होता. अखेर 1939 झाली सर्वांच्या सेवेसाठी मी तयार झालो.
तेव्हापासून आजपर्यंत फक्त आणि फक्त लोकांसाठी आयुष्य वाहून घेण्याचा मी प्रयत्न केला. आयुष्य कराडकऱ्यांच्या सेवेत घालवायचं हे सुरुवातीलाच ठरवलं होतं. त्यामुळे त्या दिवसापासून अखंडपणे कराडकरांची सेवा करण्याचे व्रत मी उचलले. हळूहळू माझे वय होऊ लागले. कृष्णा माईने ज्या-ज्या वेळी रौद्ररूप धारण केले, त्यात आजूबाजूच्या शेतीसह मीही सुटलो नाही. बऱ्याच वेळा मी नदीच्या पुरामुळे पाण्याखाली गेलो. कित्येक वेळा पावसाळ्यात दोन-दोन, तीन-तीन वेळा नदीखाली मी राहिलो. पण कधीही खचलो नाही.
पुन्हा नव्या जोमाने पुढे झालो. आता मात्र माझं वय झालं. कराडकरांसाठी आयुष्य वेचलेल्या मला अजून त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा होती. मला कृष्णामाईचा मारा सहन करावा लागला. माझ्या कवेत झाडाझुडपांनी देखील आपले अस्तित्व निर्माण केले होते. त्यामुळे आणखीनच माझा देह जीर्ण होऊ लागला. काही महिन्यांपूर्वी माझी तपासणी देखील करण्यात आली. यात माझ्या सहा व सात क्रमांकाच्या पायामधील ताकत संपल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यामुळे माझ्या अंगावरून सुरू असलेली वाहतूक शेजारील पुलावरून वळवण्यात आली. या गोष्टीला आठ-दहा दिवस होतात.
तोच सोमवारी दुपारी साडेतीन वाजता माझ्यामधील काही भाग या पावसाच्या पाण्यामुळे व माझ्या उतरत्या वयामुळे वाहून गेला. काही वेळातच माझे दोन तुकडे झाले. मला इजा झाल्याची बातमी शहरासह जिल्ह्यात पसरताच मला पाहण्यासाठी हजारो लोक माझ्याकडे धावले. यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण ते पाण्यातच गडप झाले. कराडकरांना माझ्यावर असलेली माया या निमित्ताने मला समजली. काही दिवसांपूर्वी माझे अस्तित्वच नाहीसे करण्याचा घाट घातला असल्याच्या समजूतीतून शहरातील काही मित्रांनी मला वाचवण्यासाठी जनआंदोलन उभारले. मात्र माझ्या अंगावरून वाहतूक सुरू केली, तर त्याचा माझ्यासह तिथून वाहतूक करणाऱ्या लोकांना धोका निर्माण झाला असता. यामुळे माझ्या अंगावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. आणि आठ-दहा दिवसातच माझा मधला भाग गळून पडला. तो भाग वर्षानुवर्षे जिच्या पाण्याच्या गोड आवाजाने मला उभे राहण्याची शक्ती दिली, त्या कृष्णा माईने तो भाग पोटात घेतला.
इतकी वर्षे स्वतःला त्रास करून घेतला, मात्र कराडकरांची सेवा पूर्ण झाली असे मला कधीही वाटले नाही. जेवढी जास्तीत-जास्त सेवा करता येईल, यासाठी मी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो. यापुढे हे प्रेम माझ्या नशिबात नाही, असे मला राहून राहून वाटू लागले आहे. कारण वय झाले की काही चालत नाही, याचा प्रत्यय आज मलाही आला आहे. आज माझा एक भाग गळून पडला. उद्या दुसरा पडेल, परवा तिसरा. असे एक-एक करून माझे येथील अस्तित्व नष्ट होईल. असे मला जाणवू लागले आहे. या कल्पनेने माझे डोळे भरून येऊ लागले आहेत. मला माझ्या अस्तित्वाची फिकीर नाही, तर कराडकरकरांची सेवा यापुढे मला करता येणार नाही, याचे खुप वाईट वाटते.