मुंबई – राजकीय नेत्यांच्या फोनचे बेकायदेशीर टॅपिंग केल्याचा तसेच महत्त्वाची कागदपत्रे राज्यातील भाजप नेत्यांना पुरवल्याचा आरोप असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने जबाब नोंदवून घेतला आहे. गेल्या आठवड्यात सायबर पोलिसांचे एक पथक हैदराबादला पाठवून त्यांचा तेथे जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
रश्मी शुक्लांची सध्या हैदराबादला सीआरपीएफमध्ये बदली झाली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांना जबाब देण्यासाठी आपल्याला मुंबईला येणे शक्य नसल्याचे कळवले होते. बीकेसी सायबर पोलीस स्टेशनचे पथक 19 व 20 मे रोजी हैदराबादला या अनुषंगाने गेले होते.
या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून भाजपला मदत केल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते. तसेच बदल्यांच्या संबंधातील गोपनीय कागपत्रेही त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पुरवली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना त्यांना हा प्रकार केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीला येण्यास शुक्ला यांनी सतत टाळाटाळ चालवली होती. शेवटी पोलिसांचे हैदराबादला पथक पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली.