भुवनेश्वर – यास चक्रीवादळ उद्या बुधवारी सकाळी ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धमरा बंदरातून मुख्य भूमीवर धडकणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने कळवला आहे. हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ. उमाशंकर दास यांनी सांगितले की, धमरा ते चंदबली येथून हे वादळ मुख्य भूमीवर धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र स्वरूपाचे असणार आहे. त्या भागात सध्या पाऊस सुरू झाला असून, केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमध्ये जोराचे वारे वाहू लागले आहेत. तेथील वाऱ्याचा सध्याचा वेग ताशी 80 किमी इतका आहे. हे वादळ प्रत्यक्ष भूमीवर धडकण्याच्या आधी आणि नंतर सहा तास मोठे नुकसान करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
या वादळामुळे भद्रक जिल्ह्यातील चंदबलीला मोठा दणका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विजेचे खांब आणि मोठी झाडे यातून पडण्याचा धोका आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री डी. एस. मिश्रा यांना तेथील स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले असून, त्यांना तेथे प्रत्यक्ष जागेवर पाठवण्यात आले आहे.
ओडिशाच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या 50 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात तसेच उत्तर ओडिशात 155 ते 165 किमी ताशी या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हा वेग ताशी 180 किमी इतकाही होऊ शकतो. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर आणि 24 परगणा जिल्ह्यालाही वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.