Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंतची राज्य सरकारला डेडलाइन दिली आहे. आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल. आम्ही ज्या नेत्यांना मोठे केले ते जर आमच्याच विरोधात जायला लागले तर आम्हाला त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“तसेच मी आजपर्यंत जे जे काही बोललोय ते खरे करून दाखवलंय. पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर यांना कळेल. एवढा पश्चाताप या लोकांना होईल की हा विषय आपण सोडवायला हवा होता. आता मात्र खेळ विचित्र झाला. काय समजायचे ते समजा, आम्हालाही काही मर्यादा आहेत. शेवटी आमचा संयम बघायला लागला तर आमचा नाईलाज आहे. आंदोलन शांततेत होणार, त्यावर मी आणि माझा समाज ठाम आहे. पण सरकारला पश्चाताप एवढा येणार की आजपर्यंत जीवनात कधीही आला नसेल, ” असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
छगन भुजबळ यांची आज इंदापूर येथे सभा होत आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “सभा कुणीही घ्यावी. प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. भुजबळ घटनात्मक पदावर बसले आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्यांना प्रशासनाचा ४५ वर्षाचा अनुभव आहे. अशा माणसाने जातीय तेढ, दंगलीच्या भाषा करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये. नाहीतर पुढे त्यांना दाखवून देऊ,” असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला.