नवी दिल्ली – मोदी आडनाव मानहानी दावा प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या हा निर्णय दिल्याने राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला. काँग्रेस खासदार राहुल गांधींना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर ते लोकसभेत काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
अखेर आज त्यांनी मोदी सरकारला मणिपूरमधील घटनेवरून चांगलेच घेरले आहे. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत आहे, असं विधान राहुल गांधींनी केल्यानंतर त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाने देखील राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप खासदार स्मृती इराणी देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, “देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेच्या हत्येबाबत बोलले गेले आहे. काँग्रेस पक्ष यावर टाळ्या वाजवत होता. यातून अवघ्या देशाला संदेश दिला की कुणाच्या मनात गद्दारी आहे. मणिपूर विभाजित नाही, तो आमच्या देशाचा एक भाग आहे. डीएमकेच्या एका सदस्याने तमिळनाडूत भारत म्हणजे फक्त उत्तर भारत म्हंटले होते.
राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांचे वक्तव्य फेटाळून दाखवा. काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरमध्ये जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले होते. गांधी कुटंबामध्ये हिंमत असेल, तर या देशाला त्यांनी सांगावं की काश्मीरला देशापासून वेगळं काढण्याच्या कारस्थानात काँग्रेसच्या त्या नेत्याचं विधान का आहे?” असा सवालही स्मृती इराणी यांनी केला आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधींनी आज लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर बोलताना आपली भूमिका मांडली. “मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणाने मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारले आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले नाहीत. कारण मोदींसाठी मणिपूर देश नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.