– प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघ विकासाच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना मान्यता दिली आहे. आजवर कधी झाली नव्हती एवढी प्रचंड विकास कामे आता टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. त्यामुळे विरोधकांना आता कोणतेही काम उरले नसल्याने ते टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही. सर्वसामान्य जनता सर्व काही जाणून आहे, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, विकासकामांमध्ये आडवा आला तर प्रसंगी तुडवून विकासकामे पूर्ण करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कोरेगाव शहरात ट्रिमिक्स काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारांसाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊमध्ये तीन कोटी रुपये खर्चून ट्रीमिक्स रस्ते व बंदिस्त गटारे बांधण्यात येत आहेत. त्याचा शुभारंभ ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगरध्यक्ष जयवंत पवार, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, महेश बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती उदयसिंह बर्गे, भाग विकास सोसायटीचे अध्यक्ष रामकाका बर्गे, वसंतराव बर्गे, ज्येष्ठ विधीज्ञ चंद्रशेखर बर्गे, बाळासाहेबांची शिवसेनचे कोरेगाव तालुकाध्यक्ष संजय काटकर, भाडळे खोऱ्यातील ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, संतोषआबा जाधव, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, अनिकेत सुर्यवंशी, महेश शामराव बर्गे, वनमाला बर्गे, स्नेहलता आवटे आदींसह आजी-माजी नगरसेवक, विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे म्हणाले “कोरेगाव मतदारसंघात विरोधकांना दहा वर्ष जनतेने संधी दिली होती. त्यांनी या संधीचा कधी सदुपयोग केला नाही. दहा वर्ष काळाकुट्ट इतिहास मात्र तयार करून ठेवला. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी दहा वर्षे सर्वसामान्य जनतेला खेळवत ठेवण्यापेक्षा काय केले. आज मला त्यांच्याकडून दोन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत, त्यांनी ती द्यावीत. पहिला म्हणजे त्यांना जर खरोखरच मतदारसंघावर प्रेम होते तर स्वतःच्या काळात २७ हजार शेतकरी सभासदांच्या कष्टातून उभारलेला जरंडेश्वर साखर कारखाना बारामतीकरांच्या घशात का घातला गेला ? कारखाना वाचवण्यासाठी त्यांनी काय केले.
दुसरा म्हणजे जलसंपदा मंत्री असताना बारामती आणि सांगलीकडे सातारा जिल्ह्याचे हक्काचे पाणी जात असताना मतदारसंघातील पाणी प्रश्न का नाही सोडविला ? हक्काच्या पाण्यासाठी शासन निर्णय अथवा परिपत्रके का नाही काढली ? सर्वसामान्य जनता या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यास आतुर आहे.” तुम्ही या विषयावर बोलले पाहिजे, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. महायुती सरकारने कोरेगाव मतदारसंघाला विकास कामांच्या बाबतीत न्याय दिलेला आहे. पक्के रस्ते, पाणी योजना, उपसा जलसिंचन योजना आदींसह सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली कामे सुरू होत आहेत. विरोधकांनी जर विकास कामे अडविण्याचा प्रयत्न केला, तर प्रसंगी त्यांना पायदळी तुडवून विकास कामे कोणतेही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.
सातारा -लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कोणी बंद पडले हे सर्वश्रुत आहे. या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे, महामार्गाच्या कामांची वाटणी कोणी केली ? कोणाच्या बँक खात्यावर पैसे आले ? याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. येत्या दहा दिवसात महामार्गाचे काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला टर्मिनेट करण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया कोणाला नको आहे, कोणाला त्याचा त्रास होतोय हे जनतेला माहीत आहे. महामार्गाच्या कामाची चौकशी कोणत्याही परिस्थितीत लावणार असल्याचा पुनरुचार त्यांनी केला. विकास कामांच्या बाबतीत बोलण्याचा विरोधकांना नैतिक अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई -बंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडोर कोरेगाव तालुक्यातील जात असून दुर्लक्षित भाडळे खोरे आता विकासाच्या प्रवाहात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले, त्याचबरोबर देऊर ते सातारारोड ते कोरेगाव आणि कोरेगाव ते शिरंबे हा राज्य मार्ग चौपदरी होत आहे. कोरेगाव मतदारसंघातील तीन रस्ते हायब्रीड अनुईटीमध्ये करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. पुसेगाव ते वडूज रस्ता देखील चौपदरी होत आहे.
अर्थसंकल्पामध्ये या तिन्ही प्रकल्पांसाठी निधीची तरतूद होणार असल्याची त्यांनी जाहीर केले. भाडळे खोऱ्यात जाण्यासाठी दर्जेदार रस्ता केला जात असल्याचे सांगत समृद्धी महामार्गापेक्षा इंडस्ट्रियल कॉरिडोरचा रस्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार आहे. कोरेगावातून मुंबईला जाण्यासाठी आता आपल्याला भाडळे येथे जावे लागेल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेतून रामोशीवाडी ते भाडळे खोरे असा स्वतंत्र कालवा तयार केला जाणार असून डोंगराच्या पायथ्याला असलेल्या दुष्काळी भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी प्रास्ताविकात प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊ मध्ये सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी डॉ. रोहित गजानन बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे स्वागत करण्यात आले. संतोष नलावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. सुनीलदादा बर्गे यांनी आभार मानले.
श्री भैरवनाथ मंदिर परिसर होणार चकाचक…
कोणत्याही गावाचा विकास हा ग्रामदैवतेच्या आशीर्वादानेच होत असतो, कोरेगावात ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मंदिर परिसराचा विकास करण्याच्या उद्देशाने तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी आम्ही उपलब्ध करून दिला आहे. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. आमच्या विकास आघाडीचे विकासाच्या बाबतीत व्हिजन आहे, मायक्रो प्लॅनिंग आहे,
त्यानुसारच तीन कोटी रुपयांची कामे मंदिर परिसरात होत आहेत. जुन्या कोरेगाव शहरातून कोणत्याही बाजूने ग्रामदेवतांच्या दर्शनाला यायचे झाल्यास हक्काचा आणि पक्का ट्रीमिक्स रस्ता होत आहे. आजवर या प्रभागांकडे म्हणावे असे लक्ष दिले गेले नव्हते, आता मात्र या प्रभागांचा संपूर्ण कायापालट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या लुटीचा नवी मुंबईचा ट्रेलर लवकरच
विरोधक तर खरे स्थानिक नाहीत उपरे… बाहेरून आलेला … पाहुणा… आणि गंडवा गंडवी करणाराच आहे. त्यांनी वाशीतून कॉन्ट्रॅक्टर आणले, आपण मात्र स्थानिक मतदारसंघातील युवकांना काम करण्याची संधी दिली. आजवर ४२ जण चांगले आणि दर्जेदार काम करत आहेत. तुमच्या काळात काय परिस्थिती होती, रस्ते कुठे आहेत ? नाले कोठे आहेत ? आता त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे, असे स्पष्ट करत आमदार महेश शिंदे यांनी लवकरच नवा बॉम्ब पडत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या नवी मुंबईचा ट्रेलर बाहेर पडत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
खरी सुरुवात तर त्यांनी केली आहे, आम्ही इतके दिवस शांत होतो. दहा वर्ष तुम्हाला मिळाली, आम्हाला जनतेने पाच वर्ष काम करण्याची संधी दिली आहे. आता कुठे अडीच वर्षे झाली आहेत. आम्हाला कामे करण्याची मोकळीक द्या, जनतेला आमचे काम बघू द्या, नुसती वळवळ करू नका. तुमची लुडबुड कशी थांबवायची हे जनतेला कळते. जनता ही सर्वेसर्वा आहे, असेही आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.