गुडगांव – देशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती कायम राखण्यास पोलिस असमर्थ ठरले तर देशातील लोकशाहीच संपुष्ठात येईल असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. देशभरातील पोलिस अधिक्षकांच्या एका परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, लोकशाहीत कायदे संमत करणे ही एक पवित्र जबाबदारी आहे आणि त्याचे पालन करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. जर तुम्ही पोलिस त्याची अंमलबजावणी करण्यास असर्मथ ठरलात तर लोकशाहीच धोक्यात येईल. लोकशाही व्यवस्थेत पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आपले सर्वस्व दिले पाहिजे.
तुम्ही जितक्या मनस्वीपणे ही जबाबदारी पार पाडाल तितके ते आवश्यक आणि महत्वाचे आहे. पोलिसांनी आपली जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडली तर लोकांच्या मनातही विश्वासाचे वातावरण निर्माण होते. आणि हा विश्वास जितका वाढत जाईल तितके लोक अधिक सुरक्षित राहतील असे ते म्हणाले