मुंबई – केंद्र सरकारने अग्निपथ योजनेद्वारे देशातील लष्करात भाडोत्री जवान आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा काय प्रकार आहे असा सवाल करीत जर तुम्ही भाडोत्री सैनिक भरती करीत असाल तर राज्यकर्तेही भाडोत्रीच आणा असा घणघाती हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले की आता राज्यकर्तेही टेंडर काढून भरती करा. एक्सटेंशन साठी त्यांना लोकांपुढे जाण्याची गरजही उरणार नाही.
शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुंबईत पक्ष पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना त्यांनी हा घणाघात केला. ते म्हणाले की, केवळ चार वर्षासाठी लष्करात भरती केल्यानंतर या मुलांना निवृत्त केले जाणार आहे. मग या मुलांनी पुढे काय करायचे असा सवालही त्यांनी केला. या मुलांसाठी तुम्ही काय करणार आहात असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला. त्यांनी आज पुन्हा शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट केली. ते म्हणाले की हदयात राम आणि हाताला काम अशी शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्या आहे.आमचे हिंदुत्व हे तरूणांची माथी भडकवणारे हिंदुत्व नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर जोरदार हल्ला चढवताना ते म्हणाले की, हे लोक ऐन उमेदीच्या वयात मुलांना मृगजळ दाखवणार, त्यानंतर पोरांच्या हाताला काय लागणार? अचानक काहीही योजना आणायची. त्याला काहीही नाव द्यायचे आणि त्यांना चार वर्षांनंतर बेकार करायचे हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला.
यातील केवळ दहा टक्के मुलांना लष्करात पुर्ण वेळ नोकरीची संधी मिळणार आहे. बाकीचे बेकार होणार आहेत. हा भाडोत्री सैनिक आणण्याचा प्रकार आहे. असे असेल तर राज्यकर्तेही टेंडर काढून भाडोत्री आणा असे ते म्हणाले. युवकांचा वापरही केवळ वापरा आणि फेका अशाच पद्धतीने करणार असाल तर ही पोरे भडकणारच अशा शब्दात त्यांनी या आंदोलनाचे समर्थनही केले.
उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संबंधात ते म्हणाले की या निवडणुकीत आमच्यात फूट पडणार नाहीं हे आम्ही दाखवून देऊ. महाराष्ट्रात तुमच्या सत्तेचा माज चालणार नाही असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.