मुंबई – राज्य कसे चालवायचे हे महाराष्ट्रात येऊन बघा. राज्य सर्वांना बरोबर घेऊन चालवायचे असते. कपट कारस्थानाने राज्य चालवता येत नाही अशा शब्दात आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला आहे. शिवसेना वर्धापन दिनानिमीत्त वेस्ट ईन हॉटेलात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा निशाणा साधला.
ते म्हणाले की गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या अंगावर काही किरकोळ लोक सोडले गेले होते. पण शिवसेना त्यांच्या छाताडावर पाय देऊन उभी राहिली. आज जे पिरपिर टिरटिर करीत फिरत आहेत ते उद्या शिवसेनेच्या पायापाशी असतील असेही त्यांनी नमूद केले. आम्हाला आता ईडी आणि सीबीआयची भीती दाखवू नका. आमच्या अंगावर आलात तर आता आम्ही केवळ तुम्हाला शिंगावर घेणार नाही तर पायाखाली तुडवू असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
भाजपने आम्हाला केंद्रीय सत्तेचा माज दाखवू नये असेही ते म्हणाले. तेरा घमंड तो चार दिन का ही है पगले, हमारी बादशाही खानदानी है असा शेरही त्यांनी भाजपला उद्देशून ऐकवला. अग्निपथ योजनेवरही त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैनिक नाही.