मुंबई : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर नग्नावस्थेत उतरवल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांनुसार, जमावाने त्या दोघींची संपूर्ण परिसरात नग्न धिंड काढली. शिवाय या दोघींवर सामूहिक बलात्कारही झाल्याची बातमी आहे. सामूहिक बलात्कार, धिंड काढणे आणि मारहाणीनंतर या महिलांना बोलताही येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराने देश हादरला असून मणिपूर हिंसाचाराच्या घटनांना आता पूर्णपणे वेगळे वळण लागले असून सर्व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली. तसेच या घटनेवरून गाईला आई मानणाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड यांनी एकापाठोपाठ दोन ट्विट करत या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, “बाईची नग्न धिंड काढली देश शांत, गाईची धिंड काढली असती तर देश पेटला असता. गाईला आई मानणारे, बाईला आई बहीण मानायला तयार नाहीत. मनुस्मृती.” असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
बाईची नग्न धिंड काढली देश शांत …
गाईची धिंड काढली असती तर देश पेटला असतागाईला आई मानणारे… बाई ला आई बहीण मानायला तयार नाहीत … #मनुस्मृती#Manipur #ManipurViolence
#— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2023
दरम्यान, याआधीही जितेंद्र आव्हाडांनी मणिपूरमधील घटनेवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “मणिपूर येथील हिंसाचाराचे आणि महिलांसोबतच्या दुष्कृत्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. ते पोस्ट करण्यासारखेदेखील नाहीत. कुकी आणि मैथई समाजात सुरू असणाऱ्या हिंसाचाराने अत्यंत भयाण स्तर गाठला असून महिलांवरील अत्याचाराने येथे क्रूरतेच्या सीमा पार केल्या आहेत.” असे म्हटले होते.
तसेच पुढे त्यांनी, “हे सर्व बघून या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात तरी आहे का? देशात महिला व बालविकास मंत्रालय काय करत आहे? देशात असणारा महिला आयोग याची दखल घेणार आहे का? मणिपूरच्या सद्यस्थितीबद्दल देशाचे पंतप्रधान एक अवाक्षर तरी काढणार आहेत का? असे प्रश्न पडत आहेत,” असे म्हणत संताप व्यक्त केला होता.