अहमदाबाद :- भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 14 ऑक्टोबरला येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच भिडतात.त्यामुळेच दोन्ही देशातील क्रीडा रसिकांसोबत जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत.
या सामन्यासाठी पहिल्या खेपेतील तिकीटाची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली होती.मात्र,सर्व तिकिटे अवघ्या एका तासभरातच विकली गेल्याचे (बीसीसीआय) संबंधित सूत्रांकङून सांगण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विविध सामन्यांची तिकीट विक्री सुरू करण्यात आली असून सर्व तिकिटे बुक माय शो वर उपलब्ध होणार आहेत. प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करताना मात्र, तिकिटांची प्रत जवळ ठेवावी लागणार आहे.
भारताचे सामने आणि सराव सामन्यांसाठी तिकिटांची ऑनलाइन विक्री 29 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता सुरू झाली होती. केवळ मास्टरकार्ड असलेल्या चाहत्यांसाठी ही तिकिट विक्री ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीला फक्त दोन तिकिटे खरेदी करता आली आणि भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे विक्री सुरू झाल्याच्या तासाभरातच विकली गेली.त्यामुळे इतर चाहत्यांनी तिकिटे बुक करता आली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
आता, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याच्या तिकिटांची दुसरी फेरी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही तिकिटेही काही तासांतच विकली जाण्याची शक्यता आहे.