मुंबई :- आशिया करंडक स्पर्धेनंतर आयसीसी एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड येत्या 3 सप्टेंबरला होणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
आयसीसीने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांना 5 सप्टेंबर ही संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत दिली आहे. याच मुदतीच्या दोन दिवसआधी बीसीसीआय संघ जाहीर करणार आहे.
भारतीय संघाची निवड जाहीर करण्यापूर्वी 2 सप्टेंबरला भारत व पाकिस्तान यांच्यात आशिया करंडक स्पर्धेतील साखळी सामना होत आहे. त्यात लोकेश राहुलला संधी मिळाली तर त्याच्या मॅचफीट असण्याची चाचपणी होणार आहे. यानंतरच भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ जास्तीत जास्त 15 खेळाडूंचीच निवड करू शकते. अर्थात या संघात आयत्यावेळी 28 सप्टेंबरपर्यंत बदल करण्याची मुभाही आयसीसीने दिली आहे. मात्र, 28 सप्टेंबरनंतर संघात काही बदल करायचे असतील तर आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.
भारतीय संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, महंमद शमी, महंमद सिराज. राखीव खेळाडू – तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.