कोल्हापूर- मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील समन्वयकांसोबत हितगूज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोल्हापूरमधील भवानी मंडपात आज ही संवादाची प्रक्रिया पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील तमाम नेते आणि समन्वय या हितगूज कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
ज्यावेळी मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय आला, त्यावेळी वातावरण तणावपूर्ण न करता शांततेची भूमिका आपण घेतली. त्यावेळी सगळेजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले होते. मात्र, मूळ मुद्द्यावर कुणीच बोलत नव्हते, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आरक्षण मिळवण्यासाठी वातावरणात तणाव निर्माण करण्याची किंवा स्टंटबाजी करण्याची गरज नसून कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर पद्धतीने हे काम पूर्णत्वाला नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनं करा, मोर्चे काढा; पण आजूबाजूची परिस्थितीही पाहा. देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असून, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गर्दी न करता आणि करोनाबाबतच्या नियमांचे कुठलेही उल्लंघन न करता आपला लढा चालू ठेवण्याचं मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्वांनी एकत्रितपणे कायदेशीर बाबींचा विचार करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणे गरजेचे असल्याचे यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले.