औरंगाबाद – पत्नी आणि पत्नी यांच्यात क्षुल्लक कारणावरून कुरबूर होते ही सामान्य बाब आहे. मात्र अनेक ठिकाणी ही कुरबूर घटस्फोटापर्यंत जाते. मात्र काही घटनांमध्ये पती-पत्नीतील वाद जीवघेणे ठरतात. औरंगाबादमधून अशीच एक घटना समोर आली असून पतीने पत्नीसोबत झालेल्या वादातून धारदार शस्त्राने स्वत:चाच गळा चिरला.
30 ऑगस्टच्या मध्यरात्री औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी पतीला औऱंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पतीचे नाव भाऊसाहेब काकडे असं आहे. तर त्यांच्या पत्नीचं नाव राणी काकडे आहे.
सविस्तर वृत्त असं की, भाऊसाहेब काकडे (33) आणि राणी काकडे (22) यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. सुरुवातीचे काही दिवस दोघांचं चांगलं सुरू होतं. मात्र मागील काही दिवसांत त्यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. नियमित वाद होत असल्याने भाऊसाहेब काकडे तणावात होते. यातून दोघांचं घटस्फोट घेण्याचं निश्चित झालं आणि दोघांनी रितसर घटस्फोटही घेतला.
दरम्यान घटस्फोट झाल्यानंतरही दोघांमध्ये वाद कमी झाला नाही. दोघांमध्ये शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरच वाद झाला. त्यानंतर मध्यरात्री पतीने रागाच्या भरात बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच धारदार शस्त्राने स्वत:चा गळा कापून घेतला. या घटनेने मध्यवर्ती परिसर हादरला.
या घटनेतील पतीची प्रकृती गंभीर असून येथील घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.