नायपितॉ (म्यानमार) – म्यानमारमध्ये लष्करी बंडानंतर झालेल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या शेकडो आंदोलकांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कडेकोट बंदोस्तात या आंदोलकांना तुरुंगातून सोडण्यात आले.
लष्करी प्रशासनावर आणि संसद बरखास्त करण्यात यावी आणि लोकप्रतिनिधींना पुन्हा सरकार स्थापन करू देण्यात यावे, यासाठी म्यानमारवर देशांतर्गत आणि परदेशातूनही मोठा दबाव येतो आहे. त्यामुळेच म्यानमारच्या संसदेने हा विरोध कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
देशातील विविध भागांमधील कारागृहांमधून 1,316 कैद्यांची सुटका करण्यात आली. त्याचबरोबर ज्यांच्यावर सद्या आंदोलनाचे खटले सुरू आहेत अशा 4,320 जणांचीही सुटका करण्यात आली आहे. यामध्ये म्यानमारमधील प्रसिद्ध राजकीय नेते, लेखक, चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि पत्रकारांचा समावेश आहे. जे 34 कलाकार आणि राजकीय नेते लष्करी कारवाईला घाबरून लपून बसले आहेत त्यांच्यावरील आरोपही प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहेत. तत्पूर्वी 30 जूनला संसदेने सर्वसाधारण माफीनामा प्रसिद्ध केला होता आणि देशभरातून 200 जणांना सोडण्यात आले होते.
कैद्यांना सोडण्यात येणार असल्याबाबतचा निर्णय जाहीर झाल्यावर यान्गोन शहरातील इन्सेन या प्रसिद्ध तुरुंगाबाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. ज्यांना सोडण्यात आले आहे त्यांना कठोर निर्बंध घालून सोडण्यात आले आहे, असे म्यानमारचे माहिती उपमंत्री झाओ मिन तुन यांनी सांगितले. देश उभारणीसाठीच या आंदोलकांना सोडण्यात येत असल्याचे स्पष्टिकरणही त्यांनी दिले.