चंदीगड – गहू बोनसची रक्कम जाहीर करावी या मुख्य मागणीशिवाय अन्य मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा बेमुदत आंदोलनाची हाक दिली असून त्या पार्श्वभूमीवर चंदीगड, मोहाली सीमेवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांना चंदीगडमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स, टिप्पर लावले आहेत आणि पाण्याच्या तोफांचा मारा करण्याची तयारी ठेवली आहे.अनेक शेतकरी संघटनांनी दिल्लीत एक वर्षभर चाललेल्या आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.
पंजाबच्या विविध भागातील शेतकरी मोहाली येथील गुरुद्वारा अंब साहिब येथे जमले आहेत. रेशन, बेड, पंखे, कुलर आणि स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन ते ट्रॅक्टर-ट्रॉली, बस आणि इतर वाहनांमध्ये आले आहेत.भारती किसान युनियन (लखोवाल) सरचिटणीस हरिंदर सिंग लखोवाल म्हणाले की, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना चंदीगडच्या दिशेने जाण्यापासून रोखले जाईल तेथे शेतकरी ठिय्या देतील.
गहु उत्पादकांचे उष्णतेच्या लाटेमुळे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांना बोनस स्वरूपात आर्थिक मदत दिली जावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. पुढील महिन्यात रखडलेल्या भात पेरणीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही शेतकरी विरोध करत आहेत. सरकारने 10 जूनपासून भात पेरणीची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. या खेरीज मका आणि मूग यांच्या किमान आधारभूत किमतीबाबतही अधिसूचना जारी करावी, अशी शेतकऱ्यांना मागणी आहे.