नवी दिल्ली – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘सिग्नलिंग-सर्किट-चेंज’मधील बिघाडामुळे 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात चुकीच्या सिग्नल पडल्यामुळे तिहेरी रेल्वे अपघात झाला. या अपघातात 295 जणांना जीव गमवावा लागला. गेल्या पाच वर्षांत रेल्वेमध्ये सिग्नल बिघाडाची 13 प्रकरणे घडली आहेत, परंतु एकही घटना इंटरलॉकिंग सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे घडली नाही. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत विविध सदस्यांच्या प्रश्नांना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राज्यसभेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) नेते जॉन ब्रिटास आणि आम आदमी पार्टी (आप) नेते संजय सिंह यांच्या प्रश्नांना मंत्री उत्तर देत होते.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालातील तपशील प्रथमच सामायिक करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, सिग्नल सर्किट-बदलण्यात त्रुटी आणि इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर बदलण्याशी संबंधित सिग्नलिंग कामाच्या अंमलबजावणीमुळे, रेल्वेंची मागून टक्कर झाली. या दोषांमुळे ट्रेन क्रमांक 12841 ला चुकीचा सिग्नल देण्यात आला. स्टेशनवरील यूपी होम सिग्नलने यूपी मेन लाईनवर रन-थ्रू हालचालीसाठी हिरवा दर्शविला होता, परंतु यूपी मेन लाइनला यूपी लूप लाइन (क्रॉसओव्हर 17 ए/बी) ला जोडणारा क्रॉसओव्हर यूपी लूप लाइनवर सेट केला गेला. चुकीच्या सिग्नलिंगमुळे ट्रेन क्र. 12841 युपी लूप लाईनवर धावली आणि अखेरीस मागील बाजूने थांबलेल्या मालगाडीला (क्रमांक एन/डीडीआयपी) धडकली.
2 जून रोजी चेन्नई-जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा-जाणारी शालिमार एक्स्प्रेस आणि एक मालगाडी या तिहेरी ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. वैष्णव म्हणाले की, 295 प्रवाशांना जीव गमवावा लागला, तर 176 गंभीर जखमी, 451 जणांना किरकोळ दुखापत झाली आणि 180 जणांवर प्राथमिक उपचार करून घरी गेले.
याच संदर्भात विचारलेल्या एका वेगळ्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत सिग्नल बिघाडाची 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बालासोर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 41 जणांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. या अज्ञात प्रवाशांचे मृतदेह एम्स, भुवनेश्वर येथे वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने ठेवण्यात आले आहेत आणि त्यांचे डीएनए नमुने सीएफएसएल, नवी दिल्ली येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
विभागीय चौकशी समिती आणि रेल्वे सुरक्षा आयुक्त या अपघाताच्या कारणाचा तपास करणाऱ्या प्रमुख यंत्रणा आहेत. 16 जुलैपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी 50,000 रुपये अनुग्रह म्हणून 29.49 कोटी रुपये देण्यात आल्याची माहितीही वैष्णव यांनी सभागृहाला दिली. 13 जुलैपर्यंत रेल्वे दावा न्यायाधिकरणाच्या विविध खंडपीठांमध्ये 258 दावे प्राप्त झाले असून त्यापैकी 51 दावे निकाली काढण्यात आले आहेत.