छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहे. यातच शनिवारी मुंबई येथून बिहारमधील छाप्राकडे निघालेल्या कारला समृद्धी महामार्गावर वैजापुरजवळ जांबरगाव ते लासुरगावदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हज यात्रेला जाण्यापूर्वी हे कुटूंब गावाकडे जात होते.
या अपघातात १ वर्षाच्या अख्तर रझा या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील आझाद अली खान (वय ४९ वर्षे), अफताब अली (वय २४ वर्षे), खुशबू आलम खान (वय २६ वर्षे) यास्मिन खान (वय १८ वर्षे), सोहेल आलम खान (वय ३० वर्षे) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कसा घडला अपघात ?
छाप्रा येथील हा परिवार सध्या नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहे. गया येथून १७ जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते, त्यासाठी ते आपल्या गावी छात्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरुन जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या उलटली आणि गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना घडली.
या अपघातात गाडी चक्काचूर झाला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जवळपास १००० हून अधिक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जवळपास ५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.