संगमनेर -तालुक्यातील प्रगत बाजारपेठेत गणना असलेल्या धांदरफळमधील तब्बल सुमारे सोळाशे ग्रामस्थ होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून गावठाण भाग पूर्णतः सील करण्यात आला आहे. डेंजर झोनमध्ये असलेल्या मृताच्या 18 नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
करोनामुळे मृत्यू झालेला धांदरफळातील व्यक्ती ज्येष्ठ व समाजातील प्रतिष्ठांच्या यादीत असल्याचे समोर आले आहे. त्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असल्याने ते नेहमी शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करुन घेत. गेल्या 5 मे रोजीही ते नेहमीप्रमाणे त्या खासगी रुग्णालयात आले होते. यावेळी तपासणी करताना रुग्णालयातील डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी त्या रुग्णास ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
रुग्ण व त्यांचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात गेले असता त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याची विनंती करण्यात आली.
मात्र आपल्याला काहीही झाले नसून विनाकारण राईचा डोंगर उभा करु नका.. असे ठणकावत त्या रुग्णाने तुम्हांला येथे उपचार करता येत असतील तर करा, नाहीतर मला घरी जावू द्या असे म्हणत ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घातल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच त्याच्या स्त्रावाचे नमुने घेतले. त्यानंतरही सरकारी प्रयोगशाळेच्या अहवालावर भरवसा नसल्याचे सांगत सदर स्त्राव मुंबईतील शासनमान्य प्रयोगशाळेत पाठविण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यानुसार त्याचा स्त्राव अहमदनगर ऐवजी मुंबईला पाठविल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भंवर यांनी सांगितले.
या रुग्णाची लक्षणे संशयात्मक वाटत असतानाही ग्रामीण रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेण्याऐवजी घरी जावू दिले. 5 मे रोजी घरी गेल्यानंतर हा व्यक्ती धांदरफळला गेली व एक दिवसानंतर 7 मे रोजी सकाळी 7 वाजता मृत पावली. या रुग्णाच्या निधनानंतर त्याच्या नातेवाईकांनी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे गावात सांगितले. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह धांदरफळातील अनेक प्रतिष्ठीतांनी मृताच्या घरी जावून त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
समाजातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाल्याची वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरल्याने ठिकठिकाणचे त्यांचे नातेवाईक, धांदरफळसह संगमनेर शहरातील अनेकजणांनी त्यांच्या घरी धाव घेतली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने पुढील सूचना येईपर्यंत मृताचा अंत्यविधी रोखून ठेवला. दुपारी 2 वाजता मुंबईच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी 2 या सात तासाच्या वेळेत धांदरफळ, संगमनेर शहर, साकूर, खंदरमाळ, पिंपळगाव देपा, सारोळे पठार अशा वेगवेगळ्या भागातील मृताच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरी जावून मृतदेहाचे अंत्यदर्शनही घेतले आणि त्यांच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्त्वनही केले.