मंचर- झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सोमवार (दि. 4) सकाळी अकरा वाजता उपविभागीय कार्यालय, मंचर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त आणि बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.
गेल्या महिनाभरापासून सातत्याने पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले आहे. खरिपाच्या पिकांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या,तरकारी, कांदा, बटाटा, लसूण, ज्वारी, बाजरी, मका, भात, द्राक्ष बागा, फळबागा, जनावरांसाठी असलेला चारा सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये आहे.
या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन सरकारने एकरी 50 हजार रुपये आणि द्राक्ष बागांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे, तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. या आणि इतर मागण्यांसाठी सोमवार (दि. 4) सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय, मंचर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त आणि बाधित सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.