हिमांशू
क्या बात है! बहुत खूब!! टाइम मशीन ही केवळ कविकल्पना आहे आणि कधी-मधी ती चित्रपटांत दाखवतात, एवढंच ठाऊक होतं. परंतु प्रत्यक्षात काळाचे काटे उलटे फिरवून आपण मागील काळात जाऊ शकतो, हा अनुभव खरोखर रोमांचक आहे. चालू द्या, असंच चालू द्या! वर्तमानात कुणी आणि कशाला यायचं? वर्तमानात पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहेच काय? सतत इतिहासातच राहिलेलं बरं! इतिहासाचं वाचन इतिहास घडवण्यासाठी करायचं असतं, असं म्हणतात. आता कोण म्हणतात, हे विचारू नका. कारण ते आम्हाला ठाऊक नाही. काही दिवसांपूर्वी आम्हाला निसर्गाच्या छायेत, खेड्यातल्या मातीच्या घरात राहण्याची इच्छा झाली, पिठलं आणि शेंगदाण्याचा म्हाद्या खावासा वाटला तेव्हा आमच्या दोस्तांनी “नॉस्टेल्जिक’ हा शब्द अपशब्दासारखा उच्चारून नाकं मुरडली होती. फार सेन्टिमेन्टल झालो तर आपण काळाबरोबर चालू शकत नाही, असं सुनावलं होतं.
“जात्याबरोबर जात्यावरच्या ओव्याही इतिहासजमा होणारच. त्यात एवढं वाईट वाटून घेण्याजोगं काय आहे,’ असे डोसही पाजले होते. आजकाल मात्र त्या मित्रांपैकी कुणीही वर्तमानाविषयी बोलायला तयार नाही. चर्चा, भांडणं करण्यासाठी त्यांना एकत्रही जमावं लागत नाही. सोशल मीडियावर तुफान बॅटिंग करता येते. त्यातच भूतकाळाविषयी चर्चा निघाल्या, तर विचारायची सोयच नाही. म्हणजे, “का भांडताय बाबांनो,’ असं विचारायची सोय नाही. कारण थोड्याच वेळात भांडणाचं कारण त्यांनाही कळेनासं होतं.
खरं तर आम्ही सगळे थोड्या-फार फरकानं एकाच वयाचे. म्हणजे इतिहासाचा एकच अभ्यासक्रम आम्ही सगळ्यांनी अभ्यासला असणार. पण आज या सगळ्यांचा इतिहास वेगवेगळा कसा काय, याचंच आम्हाला नवल वाटतं. पण बोलायचं कसं? आपलंच अवांतर वाचन कमी पडतंय, असं समजून गप्प राहावं आणि चर्चांमधून समजेल तेवढा इतिहास समजून घ्यावा, असं आम्ही ठरवलं. पण तरीसुद्धा गोंधळ संपले नाहीत. उलट गुंता वाढलाच. कारण एकतर कुणाचं खरं मानायचं हे कळत नाही. शिवाय प्रत्येकाला वेगवेगळ्या कालखंडांवर बोलायचं असतं. कुणाला गेल्या शे-दीडशे वर्षांतला इतिहासच फक्त हवा असतो. कुणाला पाच हजार वर्षांपूर्वीचा, तर कुणाला गेल्या सत्तर-पंच्याहत्तर वर्षांचा! काय मित्र भेटलेत राव! काही जण तर ऐतिहासिक चित्रपट तयार करताना दिग्दर्शक जशी “क्रिएटिव्ह लिबर्टी’ घेतो, तसं स्वातंत्र्य घेऊन बोलतच राहतात. एकाच घटनेविषयी वेगवेगळी मतं मांडत राहतात. कंटाळा आला की यांच्या सोशल भांडणांकडे दुर्लक्ष करून आम्ही टीव्ही लावतो. पण आजकाल तिथंही इतिहास हाच विषय चाललेला दिसतो. त्यालाही हरकत नाही. पण माहिती कमी आणि वादच जास्त असतात. कुठं जन्मस्थळाचा वाद, कुठं एकेरी उल्लेखाचा. मग टीव्हीही बंद!
टीव्ही आणि सोशल मीडिया दोन्ही टाइम मशीन झालीत… वर्तमानात राहायलाच तयार नाहीत. कदाचित भविष्याला घाबरून! डोळे मिटून शांत पहुडल्यावर आम्हाला “नॉस्टेल्जिक’ म्हणून हिणवणारे आठवतात. आपण “खरे नॉस्टेल्जिक’ असल्याचा अभिमान वाटतो. भूतकाळातलं जे “सदाहरित’ आहे, तेवढंच आपल्या मनाला, मेंदूला चिकटून आपल्याबरोबर आलंय, याचा आनंद होतो. काळाबरोबर चालता येत नसल्याचे आरोप कुणी केलेच, तरी आपल्याला भविष्याकडे किमान पाहता तरी येतंय, याची जाणीव होऊन आम्ही सुखावतो.