जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली आपत्कालिन बैठक
बीजिंग : चीनमध्ये “सार्स’सारख्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 6 जणांचा म्रत्यू झाला आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याचे चीनने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. चीन आणि तीन आशियायी देशांमध्ये सार्स सारख्या भयंकर विषाणूमुळे जलद गतीने आजार पसरत असल्यच्या पार्श्वभूमीवर या रोगाला नियंत्रित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उद्या जिनेव्हा इथे होत आहे.
या बैठकीत आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. चीनमध्ये या विषाणूजन्य रोगाची लागण सुमारे 300 जणांना झाली आहे. या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी चीन सरकारने सार्वजनिक ठिकाणी संसर्ग टाळण्याचे निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी देखरेख आणि निगराणी केली जात आहे.
या विषाणूची लागण डिसेंबर महिन्यात वुहान शहरातून पसरली असल्याचा संशय आहे. तेथेही देखरेख केली जात आहे. ज्या देशांतून विषाणूचा धोका आहे अशा देशातील तज्ज्ञही या बैठकीला उपस्थित राहून साथीच्या विषयाची माहिती सांगून वैज्ञानिक उपाय शोधून काढतील, असे चीनचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून ही लागण आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर केले जाणे ही चीनमध्ये कोणत्याही परदेशी नागरिकांनी प्रवेश न करण्याचा सूचक इशाराच असू शकेल. अशा परिस्थितीत संभाव्य आर्थिक संकट टाळण्यासाठी चीनकडून प्रादुर्भावाबाबतची परिस्थिती दडवली जाण्याची शक्यता असल्याने स्थानिक पातळीवरील देखरेखीवर जागतिक आरोग्य संघटना अवलंबून आहे.
स्वाइन फ्लू आणि इबोलासारख्या रोगाच्या प्रादुर्भावाच्या बाबत जशी काळजी घेतली गेली, तशीच याही वेळी घेतली जावी, अशी अपेक्षा “डब्लूएचओ’ने व्यक्त केली आहे. चीनमध्ये 24 जानेवारीपासून चांद्रवर्षाला सुरुवात होत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक आपापल्या घरी परतत आहेत. अशावेळी विमान आणि रेल्वे प्रवासादरम्यान हा संसर्ग अधिक फेलावला जाण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वीच प्रवासी इशारा जारी केला आहे. तापासारखी लक्षणे शोधण्यासाठी कित्येक देशांनी चीनहून येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी करणे सुरू केले.