सातारा – आरक्षणासाठी मराठा समाजाने एकत्र येत निर्धारपूर्वक लढा दिला पाहिजे. आपण एकत्र न आल्यास होणारे परिणाम पानिपतच्या लढाईइतकेच गंभीर असतील. या चुकांसाठी इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने संघर्षाची वज्रमूठ आवळायला हवी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी विभागीय गोलमेज परिषद साताऱ्यातील कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात सोमवारी झाली. या परिषदेस भाजपचे आमदार शिवेंद्रराजे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील, मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक व पाच जिल्ह्यांमधील मराठा मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. परिषदेच्या ठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा घटक म्हणून मी येथे आलो आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला
यश येण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. त्यास माझा पाठिंबा आहे. दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून आम्हाला द्या, असे आमचे म्हणणे नाही. आमचे हक्काचे आरक्षण आम्हाला द्या, अशी सर्वांची मागणी आहे. मराठा समाज एकत्र नसल्याची खंत वाटते. सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढावा. हा लढा तोडण्याचा प्रयत्न कुणी करू नये.
इतिहासात मराठा समाजाचे एकदा पानिपत झाले आहे. आता आपण सर्व जण एकत्र आलो नाही, तर दुसरे सामाजिक पानिपत व्हायची वेळ येईल. या चुकांसाठी इतिहास माफ करणार नाही. आरक्षणामुळे आजच्या पिढीवर मोठा परिणाम होत आहे. याचा विचार केंद्र, राज्य सरकार व सर्व राजकीय पक्षांनी केला पाहिजे. युवा वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातील सामाजिक घडी भविष्यात विस्कटेल. मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षणाचा फायदा व्हावा, यासाठी एकत्र लढा देऊ या.
गोलमेज परिषदेतील ठराव
मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी आणि याचिका दाखल करण्यात समितीच्यावतीने सहभागी होण्याबाबत विचार करणे, कोल्हापूर येथे 23 सप्टेंबरला झालेल्या राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेनंतर राज्य सरकारने मंजूर केलेल्या नऊ मागण्यांसह इतर मागण्यांवर चर्चा करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने मेगा नोकरभरतीस स्थगिती द्यावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज बिले सरसकट माफ व्हावीत, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याबाबत विचार व्हावा, हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विजयसिंह महाडिक हे सूचक होते तर भरत पाटील यांनी ठरावांना अनुमोदन दिले.