लखनौ – देशात करोनाने थैमान घातलं आहे. लोकांच्या मनात करोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नातलग रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यास देखील धजावत नसल्याचं अनेक ठिकाणी चित्र आहे. या महामारीने माणसांवर हल्ला केलाच, तसेच नातेसंबंधही करोनापुढे हरले आहेत. लखनौमध्ये तर बहिण-भावाचं नातंही हारलं असून सख्ख्या भावाने करोनाबाधित बहिणीचा मृत्यू होताच सुमारे १२ लाखांचे दागिने पळवल्याचे समोर आलं आहे.
दागिने आणि पैसे मागूनही मामा देण्यास तयार नाही. अखेरल मृत महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीत म्हटलं की, आई २५ एप्रिलला मुंबईहून आपला भाऊ अजयला भेटण्यासाठी कानपूरला आली होती. इथे तिला करोनाची लागण झाली. यानंतर रुग्णवाहिकेनं आईला उर्सला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याचवेळी भाऊ अजयनं आईचे सर्व दागिने काढून घेतले आणि पैसेही स्वतःकडे ठेवून घेतले. आता ते दागिने परत देण्यास मामा तयार नाही.
तत्पूर्वी महिलेच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब मुंबईहून कानपूरला दाखल झालं होतं. एका हॉटेलमध्ये थांबून ते आई बरी होण्याची वाट पाहात होते. मात्र, पाच मे रोजी महिलेचं करोनानं निधन झालं. अंत्यसंस्कारानंतर मुलीनं मामाकडे आपल्या आईचे दागिने आणि पैसे मागितले. मात्र, मामानं भाचीला धमकी देत हे दागिने देण्यास नकार दिला. पैसे तू ठेव मात्र आईची शेवटची वस्तू म्हणून दागिने आमच्याकडे राहू दे, अशी विनंती मृत महिलेच्या मुलीने केली होती. मात्र त्याला मामाने नकार दिला.